Kalavant an Nirmiti

कलावंत अन निर्मिती

निर्मितीचं वरदान प्रत्येकालाच लाभतं असं नाही आणि लाभलेल्यांपैकी प्रत्येकाला ते मानवतं असं नाही. कारण कलावंत म्हणून निर्मितीतलं ताजेपण जपणं ही सहज गोष्ट नाही.आपल्याला अनेकदा काही कसलेले कलावंत सहजपणे एखाद्या कलाकृतीला जन्म देताना दिसतात पण त्या सहजते मागे त्यांची साधना असते . जसा शांतपणॆ जलाशयावर विहार करणारा राजहंस पाहताना त्याचे पृष्ठभागाखाली अतिशय वेगाने पाणी कापणारे पाय आपल्याला दिसत नाहीत त्यामुळे आपण थक्क होतो. हे पृष्ठ्भावरलं सादरीकरण तोवरच सफाईदार दिसतं जोवर पायांचं कार्य अथक सुरु आहे.कलाकृतीतला ताजेपणा अन नाविन्यही तसंच जोवर कलावंताची नाविन्याची भूक अन त्याकरता झोकून देण्याची आस धगधगत आहे तोवरच ती टीकून रहाते. पण अनेकदा अचानकपणे मंदावते.निर्मितीच्या ध्यासाने झपाटलेला कलावंत पहाता पाहता भरकटतो अन दिशाहिन होत जातो.याला कारण यश. सिद्धी पेक्षा प्रसिद्धीचा मुकुट मोठा असला की तो घसरून डोळ्यावर येतो.अन दृष्टीभ्रम निर्माण करतो.कालच्या गेल्या पावसाळ्यावर यंदाचं पीक तगत नसतं याचा त्याला विसर पडतो.स्वत:ची अत्युत्तम निर्मिती क्षणात विसरु्न जो नवनिर्मितीच्या ध्यासात हरवू शकतो तो खरा कलावंत. आधीच्या यशस्वी भूमिकेची झूल उतरवून विवस्त्रपणे नव्या भूमीकेत शिरण्याचं शास्त्र ज्याला उमगलं तो कलावंत. याकरता विवेकासारखा सारथी सोबत असवा लागतो.यशाच्या रथावर स्वार होताना विवेकासारखा सारथी नसेल तर रथाचे वारू चौफेर उध्ळून तुमची फरपट करायला वेळ लावत नाहीत.

सृजनाचा बहर उमलता ठेवण्याकरता संवेदनांचं कोवळेपण जपणं ही देखील कलावंताकरता तारेवरची कसरतच असते. तरच श्वासातली लय अन ध्यासातला ताल कवेत घेता येतो.स्पर्शाची भाषा अन अश्रुंची लिपी कळलीच नाही तर तिचा अनुवाद तरी कसा करणार? ज्या कलावंताना ही उमगते त्यांच्या निर्मितीत त्याचे कवडसे दिसत रहातात. सामान्यातल्या सामान्य रसिकाची नाळही त्या कलाकृतीशी सहज जुळते.अन कलाकृती अजरामर होवून बसते.अशा वेळी कलाकृतीचं यश कलाकृतीच्या पायाशी सोडून पुढ्ल्या प्रवासाला निघावं सोबतीला यशाची धग घ्यावी रग नाही.
— गुरु

27 replies
  1. सतेजा राजवाडे
    सतेजा राजवाडे says:

    गेल्यावर्षी तुमचा हा लेख वाचला होता . त्यावेळी माझा लहान भाऊ हॉस्पिटलमध्ये एडमिट होता . त्याच्या उशाशी बसूनच वाचून दाखवले होते . हॉस्पिटलच्या त्याच त्या वातावरणात तुमचा हा लेख अक्षरशः संजीवनी ठरला . जवळजवळ दोन महिन्यांनंतर त्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य दिसले. आणि माझ्या डोळ्यांत पाणी आले . माझा भाऊही आर्टिस्ट आहे . आणि एका आर्टिस्टलाच या लेखातील मर्म समजू शकते … हे नक्की . अप्रतिम लिखाण. Hats off to you आणि Thank you so much. असेच छान लिहीत रहा आणि व्यक्त होत रहा . खूप खूप शुभेच्छा.

    Reply
    • Guru Thakur
      Guru Thakur says:

      धन्यवाद सतेजा!
      तुमच्या सारख्या रसिकांच्या प्रतिक्रियां मधुन अधिकाधिक सकस लिहिण्याकरता प्रोत्साहन मिळते..मनापासुन धन्यवाद हा अनुभव शेअर केल्या बद्दल!

      Reply
  2. Guru Thakur
    Guru Thakur says:

    प्राध्यापिका लेखिका शिरीन कुळकर्णी यांची प्रतिक्रिया…..

    तुमचं कलावंत आणि निर्मिती यावरील विवेचन सुरेख आहे. राजहंस आणि मुकुट दोन्ही उपमा अत्यंत चपखल आहेत. तुम्ही उपायांचा नेहमीच साक्षरता उपयोग करता. तरीही सोपं लिहिता. कठीण लिहिणं सोपं असतं, सोपं लिहिणं कठीण !
    एम. ए. लाल असताना सरोजिनी वैद्य शिकवायला होत्या. त्यांना एकदा घाबरत घाबरत विचारलं,” बाई, १९व्या शतकातली इतकं जुनं जुनं कसं वाचता ? आम्हांला कंटाळा यायला लागतो. ” तेव्हा मिळालेलं उत्तर मनावर कोरले गेलं,” संवेदनशीलता वाढवायला हवी.”
    कलावंतांची ही संवेदनशीलता मुळातच तीव्र आणि तरल असते. यशाच्या, प्रसिद्धीच्या, लोकप्रियतेच्या, पैशाच्या धुंदीने जर जमिनीवरचे पाय उचलले गेले, तर अशा कलावंतांच्या पाठीवर “समाप्त ” असा अद्रृश्य शिक्का बसायला वेळ लागत नाही.
    अनुभवाचं सच्चेपण आणि संवेदनशीलता जपली तर कलाकृती निर्माण होतात. मग ज्ञानेश्वर म्हणतात, तशी
    “अर्थु बोलाची वाट न पाहे।
    येत अभिप्राओचि अभिप्रायाते विये।
    भावांचा फुल्लौरा होतु जाए।
    मतीवरी ।।
    अशी अवस्था होते.
    खूप छान आणि मनापासून लिहिता, छोट्या छोट्या गोष्टींमधून सत्त्व टिपता. नाजूकपणे शब्द हाताळता. खूप बरं वाटतं. खूप मोठे कलावंत वर्मा.
    – शिरीन कुळकर्णी

    Reply
  3. Dr. Smita Bhuse
    Dr. Smita Bhuse says:

    सृजनशीलतेच्या कळा ज्याने भोगल्या त्याला निर्मितीचा आनंद होतो. बहुतेकदा या ना त्या कारणाने नवोदितांना पाठीवर कौतुकाची थाप देणारा कुणी लाभत नाही तर कधी समाजाकडून मिळणार्‍या अनुभूती संवेदना बोथट करून टाकतात. आपण म्हणता ते बरोबर आहे मनाचा कागद कोरा करून संवेदना उतरवत गेलो तर वेगाने पाणी कापताना राजहंसाच्या पायाला झालेल्या जखमांवर फुंकर घालण्यासाठी कवीला बळ मिळेल आणि कुणी वाचावे कुणी कौतुक करावे यापलिकडे जाऊन लिहिण्याचा आनंद निर्मितीसुख तो घेऊ शकेल

    Reply
  4. vivek jadhav
    vivek jadhav says:

    अतिशय सुंदर पद्धतीने सांगितल आहे प्रत्येक शब्दांत खोल अर्थ सामावलेला आहे !!!!!!खुपच छान गुरू सर !!!!!??????????

    Reply
  5. rajendra dipak pimpalkar
    rajendra dipak pimpalkar says:

    प्रत्येक शब्द तो मनात घर करून राहतो
    सत्य प्रितीची चाहूल मनाला भासवून जातो
    दुःखात जो कलाकार सुख अनुभवतो
    तोच त्याचे पाय जमिनीवरच ठेवतो…kp

    Reply
  6. हृषीकेश
    हृषीकेश says:

    अप्रतिम लेख.. हा लेख सर्व क्षेत्रात अविरत काम करणाऱ्या ना लागू होतो..?

    Reply
  7. Gayatri Galvankar
    Gayatri Galvankar says:

    आपलं काव्य नेहमीच भावतं…तसंच लेखनही आवडत. एक Request… सिनेमा / सिरीयल लिहा हो…. तगडे संवाद, चांगली संहिता ईतिहासजमा झालेत.

    Reply
  8. Jayshree s karle
    Jayshree s karle says:

    Haii gm
    Kalawant jasa kam karnar tyawar prekshakancha mat tayar hota ki kiti sunder kam karto ha kalawant pan nirmiti kelya nantrcha ha kalwant tya kadhe madhe apli kala dakhavto. Ani ata asa ahe ki kalawant jitka kasun tya kathemadhe kam karel titka to khup prasiddhi milawto ani tyamule nirmatyalahi bara vatat pan kam hey rudayatun kela pahije karan tyacha rudayatun nirmata hi diwas ratra ek karun apla kam manapasun karat asto ani yaa doghani jar ashi kay apapali kam bajawli tar cinema itka hit jato ki mg ashru hasna ani itar kahi goshti jya cinemat astat jya mule prekshak swatala tya cinemat zhokun detat ani mg apan tyana kalwant ani nitmata yaana pattiche mhanto ase kalwant ani nirmate jar marathi madhe ajun navnavin ale tar hindi cinema koni baghnar pan nahi. Ani atache jey cinemae navin ahet tey tar khupcha chhan ahet. So mala asa vatat ki apli marathi bhasha marathi mansa ani marathi chitrapat khup pudhe yetil. Thanks sir tumhi discussion karayla ek waaw dilat abhari ahe

    Reply
  9. स्वाती ठकार
    स्वाती ठकार says:

    खूप सुंदर विश्लेषण… प्रतिभेच्या बाबतीत माझी स्वतःची अनुभूती वेगळी आहे.. जशी,
    ती उधळत येते नक्षत्रांच्या राशी
    अन ओंजळ करते रिती इथे पायाशी
    ती हात जोडते मागत काही नाही
    पण भरून येते माझ्या ह्रदयापाशी

    मी शब्द वेचते परी ते असती मौन
    मज ब्रह्म गवसले दावा ठरतो फोल
    सत्याचा जयजयकार करा शब्दानो
    आक्रोश उरातच सलतो जिरतो खोल

    किती मंथन चाले सुर असुरांची सत्ता
    अमृत हलाहल प्राशत जगणे आता.
    स्वाती ठकार
    ता.क…गोठचे शीर्षकगीत खूप सुंदर

    Reply
    • Guru Thakur
      Guru Thakur says:

      हो. प्रत्येकाची अनुभूती, अनुभव वेगळे असू शकतात. इंग्रजी मध्ये एक म्हण आहे “There are many ways to skin a cat.”

      Reply
  10. ज्ञानेश भोर
    ज्ञानेश भोर says:

    गेल्या पावसाळ्यावर यंदाचे पीक तगत नसते —– मस्तच
    संपूर्ण लेख फार छान आहे

    Reply
  11. vaidehi joshi
    vaidehi joshi says:

    खरं आहे अगदी. हे असेच जाणवले तेंव्हा मला ही कविता सुचली
    मरगळलेल्या असंख्य कल्पना
    कागदात चुरगळल्या जातात
    आणि मग पुढे केंव्हातरी त्याच्याच
    कविता होतात
    कधी आवडल्या जातात
    कधी निवडल्याही जातात
    प्रतिभेच्या पंखानी बेभान होतात
    आणि कागदी आयुष्यात
    अगदी रममाण होतात
    आवडायला लागतं मग
    त्यांना कागदावरच राहणं
    अंमळ एखाद्या पुस्तकात
    छापून येणं
    आणि मग कुणीच कुणाचं उरत नाही
    मी,  कल्पना आणि कागद
    सगळे फक्त रसिकांचे!!

    वैदेही विजय जोशी
    20/02/17

    Reply
  12. Shweta Thakur
    Shweta Thakur says:

    कलावंताची चपखल व्याख्या ! फारच छान विश्लेषण!!

    Reply

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*