Navarasaat Budaleli Lekhni
नवरसात बुडलेली लेखणी!
(महाराष्ट्र टाइम्स – ३० सप्टेंबर २०१८)
अधुनिक वाल्मीकी अशी जनमानसात ओळख असलेल्या ग. दि… माडगूळकर ऊर्फ गदिमा यांच्या जन्मशताब्दी वर्षाला उद्यापासून प्रारंभ होत आहे. त्यानिमित्ताने आजच्या पिढीतील गीतकाराने या अलौकिक प्रतिभेच्या गीतकाराला वाहिलेली ही शब्दांजली…..
‘नाचरे मोरा आंब्याच्या वनात… नाचरे मोरा नाच…’ अगदी नकळत्या वयात डाव्या तळव्यावर उजव्या हाताची तर्जनी नाचवत आईच्या तोंडून जे शब्द कानी पडले, मनात रुजले, अन् ओठांवाटे बोबडे बोल होऊन बाहेर पडले, ते ग. दि. माडगूळकरांचेच होते. आता गीतकार म्हणून पाहताना भुलवते ती त्यातली सहजसुलभता… ज्या वयातल्या मुलांकरता ते लिहिलं गेलंय त्याच वयाला भावणारी त्यातली रुपकं, प्रतिमा अन् शब्दांची सहज तरीही नादमय मांडणी. कळत-नकळत त्या रुजलेल्या शब्दांनीच नंतर वाढत्या वयासोबत विचारांना अन् लेखनालाही दिशा दिली. गदिमांचेच शब्द सतत अवतीभवती होतेच, नंतरच्या काळातही… म्हणजे वयाच्या त्या-त्या टप्प्यावर उमलत जाणाऱ्या भावनांना शब्दरुप देणारं तरल काव्य माडगूळरांचंच होतं. शाळेत बाईंनी अगदी साभिनय ऐकवलेलं- ‘झुक झुक झुक झुक अगीनगाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी / पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया’ही गदिमांचंच. डोईवर तेल थापत निजवताना आजीच्या दबक्या अन् भागल्या आवाजातलं ‘भाबड्या त्या भक्ता पायी देव करी काम… कबिराचे विणतो शेले कौसल्येचा राम’ हेही गदिमांचंच होतं, अन् गायनवेड्या मामाने हार्मोनियमचे सूर जुळवत म्हटलेलं ‘प्रथम तुज पाहता… जीव वेडावलाऽऽऽ’ हेदेखील पुन्हा माडगूळकराचंच…!
संतसाहित्यात जी सहजता सापडते, अवघड असं अध्यात्म सोपं करुन मांडतानाही जी नादमयता त्या ओव्या-अभंगांतून वाणीला अन् मनाला भुरळ घालते, तीच गोडी गदिमांच्या लिखाणात ठायी ठायी दिसते आणि म्हणून ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ हे त्रिकालाबाधित सत्य सांगणारे गदिमा एखाद्या संत कवीसारखेच वाटतात. त्यात माझा बालपणीचा काळ म्हणजे रेडिओचे दिवस. गाणीही श्रवणीय. शिवाय संगीतात कल्लोळ शिरला नसल्याने त्यातला शब्दन् शब्द सामान्यातल्या सामान्य रसिकालाही कळेल इथपत काळजी संगीतकार घेत असत. त्यामुळे कानांवर अन् मनावर ज्यांच्या शब्दांनी संस्कार केले, त्यात ग. दि. माडगूळकरांचा सिंहाचा वाटा होता. त्याकाळी रेडिओवर गीतकाराचं नाव सांगण्याची प्रथा अस्तित्वात असल्याने ते नाव खूप जवळचं वाटू लागलं… अन् पुढे गीतकार म्हणजे नेमकं काय हे कळू लागल्यावर तर त्या नावाशी भावबंधही घट्ट होत गेला.
कवी अन् गीतकारातला फरक मांडताना मी अनेकदा म्हणतो की प्रत्येक कवीला गीतलेखन झेपेलच असं नाही. कारण गीत लिहिताना शब्दांची निवड फार हुशारीने करावी लागते. त्यात लागणारे निकष देखील तितकेच धारदार. म्हणजे मुळात शब्दांना नादमयता हवी, मग ते गेय असायला हवेत. या दोन दिव्यांतून बाहेर पडलात की मग चित्रपटगीताकरता लागणारी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे गीतकाराला परकाया प्रवेश साध्य असायला हवा. जसा नटाला ते पात्र होऊन भूमिका करावी लागते, तसंच गीतकाराला ते पात्र होऊन विचार करावा लागतो. साहजिकच त्या पात्राच्या भावना मांडताना त्याची भाषा हवी, ती शोधण्या करता त्याची पार्श्वभूमी विचारात घेणं आलं.
गदिमांच्या व्यक्तिमत्त्वातलं बहुरूपीपण इथे त्यांच्या पाठीशी उभं राहिलं असावं, असं मला वाटतं. कारण ते स्वत: उत्तम अभिनेते होते. त्यांनी कथा-पटकथा लेखन केलेल्या काही सिनेमात, ते एखाद्या भूमिकेतून अभिनेता म्हणूनही दिसले. त्यामुळे पात्र होऊन भूमिकेशी समरस होणं, त्यांना सहज साध्य झालं असावं. मग तो ‘रम्यही स्वर्गाहून लंका’ अशी दर्पोक्ती करणारा लंकाधीश रावण असो किंवा ‘एक धागा सुखाचा, शंभर धागे दु:खाचे’ म्हणणारा विणकर असो, ही झाली पुरुष पात्रं… पण ‘बुगडी माझी सांडली ग… जाता साताऱ्याला’ म्हणणारी तमाशाच्या बोर्डावर नाचणारी कलावंतीण असो किंवा ‘अपराध माझा असा काय झाला… का रे अबोला’ असा प्रश्न विचारुन नवऱ्याची लाडीक विनवणी करणारी घरंदाज विवाहिता असो, वा ‘या चिमण्यानो परत फिरा रे’ असं काकुळतीला येऊन म्हणणारी माउली असो… ही झाली सगळी स्री पात्रं. असं म्हणतात की, स्त्री होऊन तिच्या भावविश्वात शिरणं सोपं नाही. स्त्रीत्वाचे वेगवेगळे पदर शब्दांना अलवारपणे चढवण्याचं कसब तसं अवघडच, पण तेही गदिमांच्या लेखणीतून इतक्या लीलया उमटतं की वाटावं एखाद्या स्रीगीतकारानेच ते लिहिलंय. त्यांच्या लेखनातली ही सहजता, हा तर कायमच मला कौतुकाचा अन् अभ्यासाचा विषय वाटतो. आपण ज्याच्या करता लिहितो आहोत, त्या रसिकाला त्या विचाराच्या गाभ्यापर्यंत सहज पोचता यावं याची पुरेपूर काळजी गीतकाराने घेणं गरजेचं आहे. पण त्यासाठी दर्जाशी तडजोडही होता नये, असं म्हटल्यावर अनेकांना प्रश्न पडतो की ‘अशावेळी कसं लिहिणार?’ तर त्याचं उत्तर आहे ‘माडगूळकरांसारखं’.
गदिमांची काही गाणी ऐकताना आढळलेली आणखी एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे त्यातली चित्रमयता… कसबी चित्रकार ज्या सहजतेनं एखादं दृश्य कॅनव्हासवर उतरवेल, त्याच कुशलतेनं गदिमा गाण्यात चित्र रेखाटत ते डोळ्यांसमोर उभं करतात. उदाहरणच द्यायचं झालं तर या काही ओळी डोळे मिटून गुणगुणून पाहा-
‘गवत उंच दाट दाट वळत जाई पायवाट
वळणावर अंब्याचे झाड एक वाकडे
…माझिया प्रियेचे झोपडे’
किंवा
‘अंगणी अवघ्या तळे साचले भिडले जल दारा
…घनघन माला नभी दाटल्या कोसळती धारा’
अशी अनेक गाणी उदाहरण म्हणून सांगता येतील. ही चित्रमयता त्यांच्या ठायी कुठून आली असावी? त्यांच्यात चित्रकार लपलेला होता का? हा प्रश्न मनात डोकावतो अन् मग लक्षात येतं की ते उत्तम पटकथाकारही होते. साहजिकच सिनेमाकरता लागणारी चित्रभाषा त्यांना अवगत होती. पटकथा लिहिताना ती दृश्यात्मक मांडावी लागते. त्याच दृश्यात्मक शैलीचं सुरेख प्रतिबिंब त्यांच्या गीतलेखनात सदैव डोकावत राहिलं.
एखाद्या कलावंताच्या कलात्मकतेला इतके पैलू अन् कंगोरे असतात तेव्हा त्या साऱ्याचं एकत्रित सार ज्यात उतरलंय अशी एखादी भव्य कलाकृती त्याच्या हातून घडावी हे रसिकाना अपेक्षितच असतं, पण तो सुवर्णयोग सगळ्यांना साधता येतो, असं नाही. कारण पुन्हा गदिमांच्याच शब्दात ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’… पण माडगूळकरांच्या बाबतीत मात्र ते दिव्य घडलं अन् अवतरलं एक महाकाव्य- ‘गीत रामायण’. नवरसात लेखणी बुडवून केलेलं लेखन म्हणजे काय असतं, याचा पदोपदी किंवा असं म्हणू शब्दोशब्दी अनुभव ‘गीत रामायण’ वाचताना-ऐकताना येतो. त्याबद्दल लिहायला गेलं तर खंड भरतील, पण तरीही राहून गेलं असंच वाटेल, म्हणून त्याला विनम्र अभिवादन करुन गदिमांच्या प्रतिभेसमोर नतमस्तक होताना एकच प्रश्न पडतो की इतकी अफाट प्रतिभा एकाच व्यक्तीला कशी बरं वश असावी? अन् उत्तरादाखल त्यांच्याच ओळी सापडतात-
‘ज्ञानियाचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे
माझिया रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे…’
गुरू ठाकूर
सुंदर लेख
सुंदर लेख… आज पुन्हा वाचला…
‘गदिमा’… ह्यांच्या लेखणीचा आम्ही आस्वाद घेवू शकतो पण त्यांच्यावर काही भाष्य करायचे धाडस अणि योग्यता आमच्यात नाही… ते कसब अणि सहजपणा तुमच्यातच… म्हणुनच extra च कडवं तुम्हांलाच सुचत…
अणि त्यांच्यासारखीच चित्रमयता तुमच्या लेखणीतून ही अगदी सहजपणे दिसतेच…
उदाहरणार्थ, ‘अथांग’… मला तरी ते वाचताना त्याच चित्रंच डोळ्यासमोर उभं राहतं…
Thank you.. Stay blessed..
लेखातून अत्यंत प्रभावीपणे समग्र ग दि मां च दर्शन घडवलं तू . तुझं वाचन मनन चिंतन किती प्रगल्भ आहे ते कळतंच शिवाय न भूतो न भविष्यति अश्या ह्या सरस्वती पुत्राच्या लेखणीचे संस्कार तुझ्यावर झालेत आणि रुजलेत हे तुझं लिखाण आणि विचार वाचताना जाणवतं.
तुला चैत्रबन पुरस्काराने सन्मानित केलं होतं असं तू एका मुलाखतीत सांगितलं होतं, त्या संदर्भात लहानपणीचा एक किस्सा सुद्धा सांगितला होतास. खरंच मला वाटलं की तू लिहिलेल्या त्यांच्या गाण्यातील त्या ओळी ऐकायला ते असायला हवे होते.
तुझ्याबद्दल खूप अभिमान वाटतो.
ग दि मां सारख्या सिद्धहस्त कलाकार , थोर व्यक्तिमत्त्वास विनम्र अभिवादन !
खूपच सुंदर लिहिले आहेस गुरू! ग दि मां सारख्या न भूतो न भविष्यति अश्या सरस्वती पुत्राच्या लेखणीचे संस्कार तुझ्यावर घडलेत आणि रुजलेत सुद्धा … हे तुझं लिखाण , विचार वाचताना नेहमी जाणवतं. तुला चैत्रबन पुरस्काराने सन्मानित केलं होतं असं एका मुलाखतीत तू सांगितलंस, त्यावेळचा किस्सा पण सांगितला,
तुझ्या त्या चार ओळी ऐकायला ग दि मा असते तर किती आनंद झाला असता त्यांना असंही वाटलं.
सम्पूर्ण ग दि मां च दर्शन या लेखातून घडवलं तुझ्याबद्दल खूप अभिमान वाटतो.
ग दि मां ना विनम्र अभिवादन!